शहरात शिवजयंतीचा फिका उत्सव; समितीच्या कार्यपद्धतीवर जनतेचा रोष
फक्त बॅनर लावून औपचारिकता? समिती बरखास्त करण्याची चर्चा जोरात
शिंदखेडा :- तालुक्याचे ठिकाण असलेल्या शिंदखेड्यात यंदाच्या शिवजयंती उत्सवात अपेक्षित उत्साह दिसून न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवजयंतीसाठी समिती स्थापन करण्यात आली असली तरी समितीकडून केवळ बॅनर लावून औपचारिकता पूर्ण केल्याचा आरोप जनतेतून होत आहे. शिवजयंतीसारख्या प्रेरणादायी आणि ऐतिहासिक दिवशी शहरात भगवे झेंडे,सजावट, कार्यक्रम, मिरवणूक किंवा सांस्कृतिक उपक्रमांचा अभाव जाणवत असून सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज नवयुवक मंडळाच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सव वगळता संपूर्ण शहरात शुकशुकाटाचे वातावरण निर्माण झाले असल्याची चर्चा सुरू आहे.शहरातील शिवप्रेमी नागरिकांमध्ये चर्चा आहे की, समिती केवळ नावापुरती स्थापन करण्यात आली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस तयारी दिसून येत नाही.अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.शिवजयंतीच्या नियोजनात होत असलेल्या हलगर्जीपणामुळे आता समिती बरखास्त करण्यात यावी, अशी चर्चा जनतेत जोर धरू लागली आहे.
समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नागरिक म्हणत आहेत की,“पुढाऱ्यांना महाराज फक्त निवडणुकीच्या काळातच आठवतात का?हा प्रश्न आज सर्वसामान्य शिवभक्त विचारत आहेत.जनतेतून आणखी एक महत्त्वाची मागणी पुढे येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे करताना १२ बलुतेदारांना सोबत घेऊन सर्व समाजघटकांचा सहभाग सुनिश्चित केला होता.त्याच धर्तीवर शिवजयंती समितीतही केवळ मोजक्याच व्यक्तींचा नव्हे, तर १२ बलुतेदारांसह सर्व घटकांचा समावेश असावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.शिवजयंती हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून तो जनतेच्या श्रद्धेचा आणि अभिमानाचा उत्सव आहे. तो जोमाने, एकात्मतेने आणि पारंपरिक उत्साहात साजरा व्हावा, अशी भावना शिवप्रेमी नागरिक व्यक्त करत आहेत.







