प्रामाणिकतेचा आदर्श! शेतकऱ्याला हरवलेले ४० हजार परत करून युवक शेतकऱ्याने जपली माणुसकी
( वृत्त संकलन इंजि.सुयोग बोरसे
दोंडाईचा :- आजच्या स्पर्धात्मक जगातही माणुसकी अजूनही जिवंत आहे, याचे उत्तम उदाहरण दोंडाईचा येथे पाहायला मिळाले. आर्थिक संकटात सापडलेल्या एका शेतकऱ्याला दुसऱ्या शेतकऱ्याने हरवलेली रक्कम प्रामाणिकपणे परत करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्ताणे गावचे शेतकरी रमेश एकनाथ पाटील यांनी दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत मका विक्री केला होता. विक्रीचे पैसे मिळाल्यानंतर त्यांच्याकडून ४०,००० रुपयांची रक्कम अनावधानाने हरवली.
दरम्यान, विरदेल येथील युवा शेतकरी संतोष मांगा मोरे यांना ती रक्कम सापडली. त्यांनी स्वतःचा फायदा न पाहता, “ही रक्कम शेतकऱ्याच्या कष्टाची आहे” असे म्हणत, विक्री पावती व खात्री करून ती संपूर्ण रक्कम बाजार समिती कार्यालयात जमा केली.
या प्रामाणिक कृतीबद्दल दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण बाजीराव पाटील (भाऊसाहेब) यांच्या हस्ते संतोष मांगा मोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समिती सचिव पंडित केशवराव पाटील, विलास संभाजी पाटील, प्रकाश नथु बोरसे, सुशील रमेश बोरसे तसेच बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
या घटनेमुळे सर्वत्र संतोष मोरे यांच्या प्रामाणिकतेचे कौतुक होत असून, “शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल जाणणारा खरा शेतकरी तोच”, अशा शब्दांत उपस्थितांनी त्यांचा गौरव केला.