🚨 लाचखोरीत रंगेहाथ पकडलेले दोन तलाठी निलंबित — महसूल विभागातील सडलेली यंत्रणा पुन्हा उघडी!
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव ; गिरणा नदी पात्रातील वाळूने भरलेले ट्रॅक्टर सोडण्यासाठी तब्बल ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेल्या एरंडोल तालुक्यातील दोन तलाठ्यांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागातील भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
नरेश भास्कर शिरूड (वय ४१, तलाठी सजा उत्राण अहिर हद्द) आणि शिवाजी एकनाथ घोलप (वय ४६, तलाठी सजा उत्राण गुजर हद्द) अशी कारवाई झालेल्या तलाठ्यांची नावे असून, दोघेही माजी सैनिक असल्याची बाब विशेष लक्षवेधी आहे. जनतेचा विश्वास जपण्याची शपथ घेतलेले अधिकारीच लाचखोरीच्या जाळ्यात अडकत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
२७ जानेवारी रोजी गिरणा नदी पात्रातून वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडल्यानंतर ते सोडण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे. चौकशीत दुसऱ्या तलाठ्याने लाच देण्यास प्रवृत्त केल्याचेही निष्पन्न झाले. सापळा रचून दोघांनाही अटक करण्यात आली. अटकेचा अहवाल मिळताच निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी तातडीने निलंबनाचे आदेश काढले.
या घटनेमुळे महसूल विभागात नेमके किती अधिकारी अशाच पद्धतीने ‘सेवा’ देत आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे. अवैध वाळूउपसा, कारवाई आणि त्यानंतरची ‘सेटलमेंट’ ही साखळी नेमकी कुणाच्या आशिर्वादाने सुरू आहे, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
निलंबन ही सुरुवात — आता बडतर्फी व फौजदारी शिक्षा झाली पाहिजे, अशी जनतेची मागणी जोर धरत आहे







